आज मला काय वाटते.....

माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवले पाहीजे.

सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीले पाहीजे.

माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम आणि एकनिष्ठतेने मला त्यांच्या नात्याला जपता आले पाहीजे.

माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नाही. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् समज माझ्याकडे कायम असला पाहीजे.

हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही आणि करु नये.

आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.

मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी तुम्हा सर्वाचा आभारी आहे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार  लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता विश्वासाने आणि प्रामाणिकपणे काम करत राहवे.

शेवटी... थोडं स्वार्थी होऊन....
माझ्या मनातल्या आणि मानातल्या सर्वांना मी सदैव आनंद आणि समाधान देण्यास समर्थ असावे.
तुमच्या सहवासातच शेवटच्या श्वासापर्यंत बसावे.

मनोगत.....
------------------------------------------------------------------------------------

का तेच कळत नाही....

असा कसा अचानक येतो कंटाळा...
कोमेजून जातो हास्याचा मळा...
का तेच कळत नाही.

का बरं आठुन जातात आशांचे झरे....
वाटू लागते साला...मेलेलं बरे....
का तेच कळत नाही.

कशामुळे मन होऊन जाते नाउमेद...
कसलं हे जगणं, वाटू लागतो खेद..
का तेच कळत नाही.

का बरं स्वप्नं सारी क्षणात तुटतात...
सारी वचन मग खोटीच वाटतात...
का तेच कळत नाही.

डोळे अलगद अश्रूंनी भरुन येतात...
सार्या इच्छा एकदम मरून जातात...
का तेच कळत नाही.

माणसांच्या गर्दीतही भीती वाटते..
आठवणीची जञाचं मनी दाटते...
का तेच कळत नाही.

मी चुकतोय की काही चुकवतोय...
कळतंय त्यांना तरी शिकवतोय...
का तेच कळत नाही.

बावरलेल मन माझ सैरावैरा धावतयं..
आधाराचा हात घाबरतचं शोधतयं...
का तेच कळत नाही...

मनोगत......
--------------------------------------------------------
मला पाहून म्हणाला .....

सहज एकदा फेरफटका मारताना वाटेत "राग" भेटला
मला पाहून म्हणाला .....
काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

मी म्हणालो अरे नुकताच "संयम" पाळलाय घरात आणि "माया" पण माहेरपणाला आली आहे.

तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला.

पुढे बाजारात "चिडचिड" उभी दिसली गर्दीत. खरं तर ही माझी बालमैत्रीण पण पुढे कॉलेजात "अक्कल" नावाचा मित्र मिळाला आणि हिच्याशी संपर्क तुटला.

आज मला पाहून म्हणाली अरे "कटकट" आणि "वैताग" ची काय खबरबात ?

मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा !  हल्ली मी "भक्ती" बरोबर सख्य केलय त्यामुळे "आनंदा"त आहे अगदी

पुढे जवळच्याच बागेत "कंटाळा" झोपा काढताना दिसला. माझं अन त्याच हाडवैर.... अगदी 36 चा आकडा म्हणाना....
त्यामुळे मला साधी ओळख दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला.

मीही मग मुद्दाम "गडबडी"कडे लिफ्ट मागितली आणि तिथून सटकलो.

पुढे एका वळणावर "दुःख" भेटलं
मला पाहताच म्हणालं "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

मी म्हणालो, "अरे वाट पहात होतास कि वाट लावायच्या तयारीत होतास? आणि माझ्या बायकोपेक्षा तूच जास्त वाट बघतोस कि रे माझी" तसं "लाजून" ते म्हणालं, "अरे मी पाचवीलाच पडलो (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात.  कस काय सर्व ? घरचे मजेत ना?".

मी म्हणालो, "छान" चाललय सगळं....... "श्रद्धा" आणि "विश्वास" असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात त्यांच्या मदतीने मस्त चाललंय. तू नको "काळजी" करूस. हे ऐकल्यावर "ओशाळलं" आणि निघून गेलं.

थोडं पुढे गेलो तोच "सुख" लांब उभं दिसलं तिथूनच मला खुणावत होतं,  धावत ये नाहीतर मी चाललो मला उशीर होतोय.....

मी म्हणालो, "अरे कळायला लागल्यापासून तुझ्याच तर मागे धावतोय उर फुटे पर्यंत, आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट झालीय......... एकदा दोनदा भेटलास पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट करून मला एकटं पाडलत दर वेळी. आता तूच काय तुझी "अपेक्षा" पण नकोय मला. मी शोधलीय माझी "शांती" आणि घराचं  नावच "समाधान" ठेवलंय."


तसं ते हसलं माझ्याकडे पाहून आणि परत पाठ फिरवून निघून गेलं "मत्सरा"च्या हातात हात घालून अन मला "इर्षे"च्या विळख्यात ढकलून.......

मनोगत......

No comments:

Post a Comment